ठाणे : महाराष्ट्र सरकारने वन विभागाच्या माध्यमातून २०१७मध्ये एक जुलै ते सात जुलै या कालावधीत चार कोटी वृक्ष लावण्याचा कार्यक्रम घोषित केला आहे. त्याअंतर्गत ठाणे महानगरपालिकेच्या वतीने चालू वर्षात एकूण तीन लाख वृक्ष लागवड करण्याचे नियोजन केले असून, त्यापैकी दोन लाख वृक्ष वनविकास महामंडळ या तज्ज्ञ संस्थेकडून लावण्यात येणार आहेत.
यापैकी एक लाख वृक्ष एक जुलै रोजी लावण्यात आले. शीळ येथील, खरीवली देवी मंदिराच्या डोंगराच्या पायथ्याशी ४० हजार वृक्ष आणि खरीवली देवी मंदिराच्या डोंगराच्या पाठीमागील भागात ५० हजार वृक्ष लावण्यात येणार आहेत. तसेच कौसा येथील मुंब्रा-बायपास दर्ग्यासमोरील डोंगरावर ४६ हजार रोपांची लागवड करण्यात येणार असून, या कार्यक्रमाचा शुभारंभ राज्याचे सार्वजनिक बांधकाम (उपक्रम) मंत्री व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व महापौर मीनाक्षी राजेंद्र शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे.
या वेळी खासदार राजन विचारे, डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार प्रताप सरनाईक, जितेंद्र आव्हाड, संजय केळकर, सुभाष भोईर, अॅड. निरंजन डावखरे, रवींद्र फाटक, उपमहापौर रमाकांत मढवी, सभागृह नेते नरेश म्हस्के , विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील, महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाचे अध्यक्ष के. पी. बक्षी, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव दिनेशकुमार जैन, उद्योग ऊर्जा व कामगार विभागाचे अपर मुख्य सचिव सुनील पोरवाल, पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव तथा ठाण्याचे पालक सचिव सतीश गवई, नगर विकास विभागाच्या (२) प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, कोकण विभागाचे विभागीय आयुक्त जगदीश पाटील, पोलीस आयुक्त परमबीरसिंग, महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल, जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर, अतिरिक्त आयुक्त (१) सुनील चव्हाण, अतिरिक्त आयुक्त (२) अशोककुमार रणखांब व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तसेच शहरातील विविध सामाजिक संघटना, स्वयंसेवक वृक्षरोपण उपक्रमात सहभाग घेत आहेत.
केंद्र सरकार व महाराष्ट्र शासनाकडून ‘अमृत ग्रीन स्पेसेस’ योजनेच्या माध्यमातून २८ हजार वृक्षांची लागवड करण्याची योजना मंजूर करण्यात आली असून, या महोत्सव कालावधीमध्ये ब्रह्मांड परिसरात ही रोपे लावण्यात येणार आहेत. याशिवाय ज्या ठिकाणी रस्त्यालगत लावगडीला जागा आहे, अशा ठिकाणीदेखील रोपांची लागवड करण्यात येणार आहे. वरील संपूर्ण वृक्षारोपण मोहिमेमध्ये महापालिकेमार्फत ट्री गार्डवर कोणताही खर्च करण्यात आला नाही. तथापि सुमारे एक हजारापेक्षा अधिक ट्री गार्ड प्रायोजकांच्या माध्यमातून उपलब्ध करून घेण्यात आले आहेत. एक जुलैपासून करण्यात आलेल्या रोपलागवडीचे जिओ टॅगिंगदेखील करण्यात येणार असून, ही माहिती महापालिकेच्या वेबसाइटवर नागरिकांना पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
२०१५-१६ पासून ठाणे महानगरपालिका, ठाणे वृक्षप्राधिकरणामार्फत दोन वर्षांत पाच लाख वृक्षलागवड योजना राबविण्यात येत असून, या योजनेअंर्तगत सन २०१५मधील पावसाळी हंगामात सुमारे ५० हजार रोपांची लागवड करण्यात आली. प्रामुख्याने लोकसहभाग, तसेच विविध प्रायोजकांमार्फत हे वृक्षारोपण करण्यात आले आहे. सन २०१६मध्ये सुमारे एक लाख ६१ हजार रोपांची लागवड करण्यात आली. आतापर्यंत एकूण दोन लाख ११ हजार रोपांची लागवड करण्यात आली असून, त्याची जोपासना व वाढ उत्तम तऱ्हेने होत आहे. त्यापैकी सुमारे एक लाख वृक्ष ठाणे महानगरपालिकेमार्फत वन विकास महामंडळाकडून लावण्यात आले आहेत. सन २०१५ व २०१६मध्ये करण्यात आलेल्या रोप लागवडीचे जिओ टॅगिंग करून, ते नागरिकांना पाहण्यासाठी महापालिकेच्या वेबसाइटवर उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती महापालिका अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांनी दिली.